बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ असलेले हे तीव्र चक्रीवादळ आज (ता. ५) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान धडकणार असून, बपतला जवळ जमिनीवर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या प्रणालीमुळे राज्यात ढगाळ हवामान झाले असून, विदर्भात पावसाची शक्यता आहे.
नैॡत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटे पासून ‘मिगजौम’ चक्रीवादळ घोंघावू लागले आहे. सोमवारी हे चक्रीवादळ आणखी तीव्र झाले असून, चक्रीवादळाचे केंद्र चेन्नईपासून ९० किलोमीटर पूर्वेकडे, तर नेल्लोरपासून १७० किलोमीटर आग्नेयेकडे, पदुच्चेरीपासून २०० किलोमीटर ईशान्येकडे, बपतला पासून ३०० तर मच्छलीपट्टणम पासून ५३० किलोमीटर आग्नेय दिशेला होते. ही प्रणाली आज (ता. ५) दुपारपर्यंत आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मच्छलीपट्टनम दरम्यानच्या बपतलाजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
किनाऱ्यालगत येताच या चक्री वादळामुळे ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहणार आहेत. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यासह रायलसीमा, ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्यासह समुद्र खवळल्याने एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत होणार असून, कच्ची, पक्की घरे, रस्ते, भात पिके, फळ पिके यांचे नुकसान होणार आहे. तसेच जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे पडणार असून, समुद्र खवळल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.