आठवडाभरापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कांद्याचे दर वधारून प्रतिकिलो ३५ ते ३६ रुपयांवर गेला होता; मात्र मध्य प्रदेशमधील कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारात कांद्याच्या दरात ५ ते ६ रुपयांनी घसरण झाली आहे.
एपीएमसी घाऊक बाजारात दोन आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर स्थिर होते, परंतु मागील आठवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन ५ ते १० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे बाजारातही कांदा ४० ते ४५ रुपयांवर गेला होता. गेल्या एक ते दोन महिन्यांत राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे साठवणुकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता; तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात उच्च प्रतीचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत आहे. अशातच राज्यात आता मध्य प्रदेशातून कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांतही मध्य प्रदेशमधील कांदा मोठ्या प्रमाणावर येत असल्याने राज्यातील कांद्याच्या दरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिक बाजारात कांद्याचे दर कमी करण्यात आल्याचे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले आहे.
पुन्हा दरवाढीची शक्यता : एपीएमसीमध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने दर गडगडले आहेत. सोमवारी कांद्याला २५ ते ३५ रुपये एवढा दर होता; तर सद्यस्थितीत २० ते ३० रुपयांनी विक्री होत आहे. आठवडाभर अशीच स्थिती राहील, असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच त्यानंतर पुन्हा कांद्याची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.